पंकज पाटील/रावेर केळी पिक विमा परतावा शेतकऱ्यांना अजूनही मिळत नाहीये. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी पुरता हैराण झाला आहे. मोर्चे,आंदोलन, उपोषण शेतकऱ्याकडून चालूच आहे, परंतु आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विमा कंपनी कडे राज्य शासनाने त्यांच्या वाट्याचा हिस्सा अजूनही भरला नसल्याची धक्कादायक बाब रावेर येथे उपोषणादरम्यान उघडकीस आल्याने शेतकरी चांगले संतप्त झाले आहेत.
केळी पिक विम्याचा परतावा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावा यासाठी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील हे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणस्थळी विमा कंपनीचे प्रतिनिधी राहुल पाटील यांनी भेट दिली. यावेळी यावेळी राहुल पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व अजूनही राज्य शासनाच्या हप्ता बाकी असल्याची माहिती उपोषणकर्ते सचिन पाटील यांना दिली अशी माहिती सचिन पाटील यांनी बनाना परिसरला दिली आहे.
शेतकऱ्यांना विमा परतावा तात्काळ मिळावा म्हणून जिल्ह्यात विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये परस्परांवर चिखल फेक चालू आहे. हीच ताकद त्यांनी राज्य शासनावर दबाव टाकून आधी राज्य शासनाला विमा कंपनीचा हिस्सा भरायला लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अरे देवा; अजूनही विमा कंपनीला राज्य शासनाचा हप्ता मिळालाच नाही
