सलग दुसऱ्या दिवशीही केळी पट्ट्यात वादळाचे थैमान
सावदा प्रतिनिधी
25 रोजी झालेल्या वादळात रावेर तालुक्यात शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर वरील जमीन भुईसपाट झाली तर अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाली असल्याने अनेक संसार बेघर झाले आहेत दुसऱ्या दिवशी 26 रोजी संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान कोचुर , रोझोदा, चिनावल,सावदा भागात सलग वादळाने थैमान घालत कोट्यावधी रुपयाचे नुकसान केले आहे अनेक भागात मोठी झाडे पडली आहेत.विजेचे खांब व तारा तुटून नुकसान झाले आहे.यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे आज 26 रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान प्रचंड वेगाच्या वाऱ्यासह पावसामुळे हजारो हेक्टरवरची केळी भुईसपाट झाली आहे तर दोन तासापासून वीज बंद आहे.
रावेर तालुक्यातील वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने दि. २५ रोजी संध्याकाळी सात वाजता थैमान घातले. या वादळात रावेर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये तब्बल २५५ घरांचे नुकसान झाले आहे . घरांवर झाडे पडली विजांचे खांब वाकून तारा तुटल्या असून अनेकांचे संसार उघड्यावर आले. तसेच केळी बागा मोठ्या प्रमाणावर आडव्या झाल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.तालुक्यात 25 कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
रावेर तालुक्यातील आटवडे, तांदलवाडी ,बालवाडी, सिंगत मंगलवाडी ,खिरोदा प्र.या., सहस्रलिंग या गावातील 255 घरांचे नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील 32 गावांमधील 704 शेतकऱ्यांचे 602 हेक्टर वरील केळी बागा या जमीनदोस्त झाल्या असून सुमारे 24 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा असा प्राथमिक अहवाल तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कडून रावेर तहसील यांना प्राप्त झाला आहे. महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करणे चालू असून या नुकसानामध्ये अजून वाढ होऊ शकते अशी माहिती तहसीलदार बंडू कापसे तसेच नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली आहे
रावेर तालुक्यातील तांदलवाडी,पुरी ,गोलवाडा खानापूर, सावदा अर्बन यावल तालुक्यातील यावल शहर, दहिगाव, हरिपूर या भागांमध्ये सुमारे दहा ते बारा ट्रांसफार्मर मोडून पडले आहेत तर 50 एल व्ही पोल, 105 एल टी पोल आडवे झाले असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सुमारे 30 लाखाचे अंदाजित नुकसान झाले आहे अनेक गावांमध्ये वीज प्रवाह सुरळीत करण्याचे काम रात्रभर दुसऱ्या दिवशीही चालू होते अशी माहिती कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी दिली आहे